शेतकरी आणि केंद्र सरकारमधील चर्चा फोल, आंदोलन सुरुच
नाशिक मिरर वेबटीम : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. त्यांमुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका नाशिक जिल्ह्याला बसताना पाहायला मिळत आहे.दिल्लीच्या सीमेवर गेल्या ८ दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. याचा फटका नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना बसतोय. पंजाबवरुन येणारा गहू आणि तांदूळ अडकून पडल्यानं रेशन दुकानावरील व्यवस्था कोलमडून पडली आहे.त्यामुळे नोव्हेंबर मधील मोफत चे धान्य वाटप अद्याप झालेले नाही .तर डिसेंबर महिन्याचे रेशनचा पुरवठा झालेला नाही त्यामुळे धान्य वितरण बंद आहे. रेशनचे धान्य अडकल्यानं नाशिक जिल्ह्यातील 6 तालुके प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ यासह अन्य तालुक्यांमध्ये रेशन दुकानांवर धान्य उपलब्ध नाही. तर नाशिक शहरातही रेशन दुकानांवर गहू आणि तांदुळाला तुटवडा जाणवत आहे. आंदोलन लांबल्यास गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. देशभरातील जवळपास 35 शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची याच्या बैठकीत केंद्र सरकारकडून कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना MSPवर प्रेझेंटेशन देण्यात आलं. सोबतच बाजाराच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आली. यावेळी MSPला कायद्याचा भाग बनवलं जाणार का? हा एकच प्रश्न शेतकरी संघटनांनी विचारला. तीन तास चाललेल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डरसह अन्य जागांवर सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच असेल. इतकच नाही तर पंजाब आणि हरियाणातून अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. त्यामुळे आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
