नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करतील त्या ग्रामपंचायतीला आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देणार असल्याचे सांगितले. या तालुक्यात ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.यासंदर्भात आमदार अहिरे म्हणाल्या, कोरोना संकट काळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकांच्या काळात कोरोना महामारी संकट अधिक बळावू नये यासाठी देवळाली मतदारसंघातील ग्राम पंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे.या स्थानिक निवडणुकांत कुटुंब, भाऊबंदकीत मोठी ईर्षा निर्माण होते. या स्पर्धेतून स्थानिक संबंध बिघडतात. स्पर्धा निर्माण होते. हे राजकारण कधी कधी टोकाची भुमिका घेते. नात्यागोत्यांत दुरावा, शत्रुत्व निर्माण होते. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांसमोर निवडणुक रिंगणात उतरतात. कुटुंब या राजकारणात होरपळले जाते. हे टाळण्यासाठी आणि गावातील शांतता, सामंजस्य कयम रहावे यासाठी प्रयत्न करणार आहे. यातून गावाचा निश्चितच विकास होईल. कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावरही निवडणुकांचा ताण पडू नये यासाठी निवडणुका बिनविरोध होणे काळाची गरज आहे. त्यामुळे ज्या गावांत निवडणुक बिनविरोध करतील त्यांना 25 लाखांचा निधी देण्यात येईल.नाशिक तालुक्यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांतच राजकारण सुरु आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. गतवर्षी झालेल्या विधानसभा निववडणुकीत शिवसेनेचे आमदार योगेश घोलप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज अहिरे यांच्यातच लढत झाली होती. त्यात शिवसेनेची गेल ीतीस वर्षे असलेली सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसने खालसा केली होती. या तालुक्यात अनेक मोठी गावे असून त्यांच्यात विविध गाव पातळीवरील स्थानिक नेते सक्रीय आहेत. त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळे गावांच्या निवडणुकीत राजकीय एकमत होते, याची उत्सुकता आहे.
