नाशिक मिरर वेबटीम :दिल्ली देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारनं जाहीर केलं. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. दरम्यान, आज दि. ११ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला , तसंच यावेळी पहिल्या ३ कोटी लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.१६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. “आपल्याला लोकांना जागरूक करत राहावंच लागणार आहे. हेच काम कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही करावचं लागणार आहे. या लसीकरणावर वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारत काम करत राहणार आहोत ,आणि आपण त्याच दिशेने पुढे जात आहोत,” असं मोदी यावेळी म्हणाले.राज्यांसोबत चर्चा केल्यानंतरच लसीकरणाला कोणाला प्राधान्य द्यायचं हे ठरवलं जाणार आहे. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनंतर फ्रन्टलाईन व्हर्कर्सना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईनव्हर्करसना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा खर्च राज्यांना उचलावा लागणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. “कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि दुसरा डोस दिल्यानंतर अंतिम प्रमाणपत्र दिलं जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. “पुढील काही महिन्यांमध्ये ३० कोटी लोकांना लस द्यायची आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत पसरलेल्या अफवा थांबवण्याची जबाबदारी ही राज्यांवर आहे. यासाठी धार्मिक आणि अन्य संघटनांशी चर्चा करून पावलं उचलली गेली पाहिजे,” असं मतही मोदींनी यावेळी व्यक्त केलं. केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लू पसल्याची माहिती आहे. बर्ड फ्लूच्या नियंत्रणासाठी प्राणीसंग्रहालय, पोल्ट्री फार्म आणि पाण्याच्या स्त्रोतांसारख्या ठिकाणी लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
