नाशिक मिरर : पावसाळी व भूमिगत गटारींमध्ये सांडपाणी सोडून नंदिनी नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील २६ उद्योगांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. रासायनिक सांडपाणी थेट गटारीत सोडल्या मुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, 9 जून रोजी महापौर यांनी नंदिनी नदीच्या प्रदूषणाची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पर्यावरण विभागाने विभागीय अधिकार्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील २६ कंपन्यांनी महापालिकेच्या पावसाळी गटार योजना तसेच भूमिगत गटार योजनेत रासायनिक सांडपाणी सोडल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व प्रदूषणकारी कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपाच्या पर्यावरण विभागाने २६ कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
महापौरांच्या आदेशानंतर मनपाचा पर्यावरण विभाग सक्रिय झाल्याचे दिसून आले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्वतः नंदिनी नदी प्रदूषणाची दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी घेतलेल्या बैठकीत अंबड आणि सातपूर एमआयडीसीतील अनेक कंपन्यांकडून सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर या नदीपात्रात रासायनिक सांडपाणी सोडणार्या कंपन्यांविरोधात महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कारवाईला वेग आला आहे.
