महादेववाडी परिसरात शोककळा; ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप
नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर येथे मानवी निष्काळजीपणाने चार निरपराध जीव गमावले! सातपूरमधील महादेववाडी परिसरात बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) सकाळी घडलेल्या भीषण जळीत दुर्घटनेत भाजलेल्या सहापैकी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी ठेकेदारांच्या बेफिकीरीवर संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादेववाडी येथील खोका मार्केटसमोर पिंपळाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू होते. कामासाठी आलेल्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला पेट्रोलने भरलेली प्लास्टिक कॅन ठेवली होती. दुर्दैवाने, त्या कॅनवरून एक चारचाकी वाहन गेल्याने पेट्रोल सांडून क्षणात भडका उडाला. आणि परिसरात भीषण आग भडकली.
या आगीत दोबाडे कुटुंबातील लता कैलास दोबाडे, कैलास छगन दोबाडे, दुर्गा आकाश दोबाडे, भावेश आकाश दोबाडे, तसेच सोनाली राजेश गाडेकर आणि पंकज कैलास दोबाडे असे एकूण सहा जण गंभीर भाजले होते. तातडीने सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र स्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान पंकज कैलास दोबाडे (वय ३०), दुर्गा दोबाडे (वय २२), कैलास छगन दोबाडे (वय ६०) आणि सोनाली राजेश गाडेकर (रा. महादेवनगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीड वर्षीय बालक अद्यापही गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सातपूर अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडले, तर दोबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
