नाशिक मिरर विशेष : मानवी जीवन हा मानवासाठी अभ्यासाचा आणि औत्सुकतेचा विषय! प्रत्येक अभ्यासाअंती वेगळे निष्कर्ष मिळण्याची दाट शक्यता. अभ्यास करणाऱ्या प्रगल्भ विचारांवर ते अवलंबून आहे.
आपण जसे जसे मोठे होतो तसा तसा आपल्याला भूतकाळ भारी वाटायला लागतो. “आधीचं किती छान होतं, नाही?” असे विचार मनात घोळू लागतात. काही अनुभव, आठवणी कटू, क्लेशदायक असतातही परंतु सध्या जगत असलेल्या काळापेक्षा गतकाळात साधेपणा, समाधान जाणवते. का? कारण ‘आज’ आपला निवांतपणा हरवलेला असतो, आपण धावपळीत गुरफटलेले असतो. आणखी…. आणखी.. मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि दमलो की मग आठवणीत रमतो. गंमत हीच आहे की भूतकाळातील ते ‘समाधान’ काळ गेल्या नंतर उमजते.
मानवी जीवन सतत उत्क्रांत करीत असते. जशी गरज भासेल तसे शोध लागतात आणि उन्नती होत जाते. अधिकाधीक विकसित होत जाताना काही गोष्टी सुटत जातात आणि कधीतरी नेमक्या आठवतात आणि मनाला हुरहूर लावतात. पाटी पेन्सिल पासून ते टॅब, लॅपटॉप पर्यंतचा, परकर पोलंके पासून ते क्रोपटॉप मिनी स्कर्ट पर्यंतचा, तेल मीठ पोळी किंवा तूप साखर पोळी पासून ते पिझ्झा पर्यंतचा, शेणामातीने सारवलेल्या अंगणापासून ते अंगण विरहित फ्लॅट पर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनीच अनुभवलाय. यात कुतूहल, मजा वाटत असली तरी जुने दिवस मोरपिशी वाटतातच!
माणसाला कसे पटकन सारे काही हवे असते आणि मिळाले की चटकन त्याचे कुतूहल, अप्रूप नाहीसे होऊन नवे काही मिळण्याची आस त्याला लागते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. आपली जडणघडण कशी झालीये आणि आपण ती कशी जपतो, टिकवतो, अभिवृद्धीत करतो, की लयास नेतो यावर सगळे अवलंबून आहे. आज ला काल व्हायला वेळ लागत नाही आणि उद्याही भर्रकन येतो. आपण आज कसे जगतो? स्वतःला कसे समृद्ध करतो? यावरून आपल्या भूतकाळाला सुरेख, सुंदर, वाईट, कष्टीक इत्यादी विशेषणे लागतात. भविष्याचे म्हणाल तर भविष्यकाळ हा नेहमीच तांत्रिक दृष्ट्या बळकट, प्रगत होत जातो आणि जाईल. आज आहोत त्यापेक्षा ‘उद्या’ सगळ्यांनाच प्रगत हवा असतो. जे जे आज मिळाले नाही ते सर्व ‘उद्यात’ अर्थात भविष्यात मिळावे म्हणून माणूस धडपडत राहतो. तो खूप आशावादी आणि ध्येयवादी असल्याने त्याला त्याच्या सुखांचाही विकास हवा असतो. त्यामुळे आजचा माणूस भविष्यात डोकावताना साहजिक तंत्रज्ञानाशी अधिक गट्टी त्याच्या मनात येते. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे असे आपण म्हणतो. एके काळी माणसा माणसात होणारा मनमुराद संवाद आता या छोट्याशा मोबाईल नामक यंत्राने साधला जातो. त्याचे नावच ‘स्मार्ट फोन’. नावा प्रमाणेच अगदी स्मार्टली तो आपल्या मनावर राज्य करतोय. सगळ्या भावना आपण आज या मोबाईल द्वारे व्यक्त करतो. एका बोटाच्या स्पर्शाने इकडचा निरोप तिकडे होतो. गंमत आहे ना? मग भविष्य आणखी प्रगत म्हणजे जादूचं असेल नाही? कदाचित तेव्हा बोटाच्या स्पर्शाचीही गरज पडणार नाही. फक्त बोलायचे की या मनातलं त्या मनात जाईल. कदाचित हा मोबाईल आपल्या कडे चालत सुद्धा येईल. कदाचित रोबट चे छोटे पिल्लू असे त्याचे स्वरूप असेल. या यंत्रात आपण बोलताना एकमेकांना अधिक स्पष्ट बघू शकू. कुणी हळवं झालं तर कदाचित आपल्याही डोळ्यांत पाणी येईल. पण बोलणाऱ्याचे डोळे मात्र आपण पुसू शकणार नाही. या यंत्रामुळे आपण आपल्या माणसांशी प्रत्यक्ष बोलतोय हा आभास निर्माण होईल पण स्पर्शाचा तेथे नेहमीच अभाव राहील.
सारं काही होईल पण तांत्रिक युगात भावनांचा ओलावा कितपत जपला जाईल हे सांगता येणार नाही. माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला खूप काही सांगून जातात. डोळे बोलत राहतात. आपल्या संवेदना जाग्या असतील तर मूक संवाद ही समाधान देऊन जातो. पण केव्हा? माणूस माणसाला प्रत्यक्ष भेटतो तेव्हा…म्हणून आपला भूतकाळ चांगला होता की भविष्य चांगलं असेल या विचारात न पडता आपण “आज” भरभरून जगलो पाहिजे. ते समृद्ध केलं पाहिजे. माणसाचा भूतकाळ आणि भविष्यकाळ हा “आज” वर अवलंबून आहे. म्हणून आपल्या “आज” ला महत्व दिले पाहिजे. ते अधिकाधीक डोळसपणे जगले पाहिजे.
